उपासना ....
उपासना कशी करावी किवा काय करावे म्हणजे व्यक्ती खूप भाविक ठरेल. ह्याचे काही साचेबद्ध नियम नाहीत . प्रत्येक व्यक्ती ची उपासना करण्याची आपापली पद्धत असते जी त्या त्या व्यक्ती ने स्वतः जोपासली वाढवली आणि स्वतः पुरती मर्यादित असुन स्थिर केलेली असते .
त्यामुळे च अमुक एकाच पद्धतीने उपासना किंवा उपासना सिद्ध होते असे म्हणता येणार नाही. कुणी कशा पद्धतीने भक्ती करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. किंवा नसेलही जरी कुणी भाविक मनाचा तर त्यामुळे ती व्यक्ती वाईट ठरत नाही. भाविक असणे म्हणजे सुचारीत्र्याचे प्रमाण पत्र नक्की च नाही. कुणी काय खावे किंवा न खावे ह्याचा त्या व्यक्ती च्या भाविकतेशी संबंध निश्चित च नाही.
पण हिंदु आध्यात्म आत्मसात करणारे लोक बहुतांशी शुद्ध शाकाहारी होतात. अगदी सरसकट शंभर टक्के नाही तरी बहुतांशी होतात हे खर आहे .पण ते आध्यात्मिक उच्च पातळीवर असतांना होत असावे कारण हिंदु अध्यात्म सहसा आपल्या आत डोकावून बघायला सांगत असते. त्यामुळे होते हे कि प्रत्येक सजीवाचा विचार करतांना आधी स्व भावना ताडुन पाहिल्या जाते उदाहरणार्थ, माझे बोट कापले किंवा चटका बसला तर मला किती त्रास होतो तसाच सर्व सजीवांना होत असेल.असा विचार बळावला कि व्यक्ती आपोआप शाकाहारा कडे वळत असावा .अध्यात्मिक दृष्ट्या व्यक्ती जेव्हा वर जात असते टप्प्याटप्प्याने गरजा आपोआप नियंत्रीत होतात. भावभावनां वर जसा आपोआप अंकुश येतो तसेच आवडीनिवडी चव आणि बेचव ह्या बाबतीत काहीशी निस्पृहता आपोआप येत जाते. हे सगळं बदल संबंधित व्यक्ती मधे घडत असतांना त्या व्यक्ती ला वैयक्तिक काही प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण ती व्यक्ती सामान्यतः वरच्या पातळीवर पोहोचलेली असते.
भक्ती त्यामानाने कमी प्रतीची नाही पण तरी एक दोन पायरी खाली असते .भाविक असणे हि एक सर्व साधारण भावना आहे. ती जवळपास सर्वांच्या ठिकाणी समप्रमान असते . त्यामुळे कुणी काय खाल्ले, काय केले कि कुणाची उपासना सिद्ध होत नाही. तसे कुणाला लेबल लावणे खरोखर गरजेचे नाही. तसे करणे अतिरेकी पणाचे ठरेल. आदर्श उपासक असण्याची अशी कुठलीही ठराविक कृती नाही. तसे करण्याचा प्रयत्न चुकिच्या दिशेला नेवू शकतो .
ज्योती देशमुख इंगळे
Comments
Post a Comment